Thursday, July 03, 2008

man vadhaay vadhaay - sant bahiNaabaai


मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर || १ ||

मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावऱ्हल्या रे लाटा || २ ||

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वहादनं || ३ ||

मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर
आता गेलं आभायात || ४ ||

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इचू - साप बरा
त्याले उतारे मंतर! || ५ ||

मन चपय चपय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धरीवर || ६ ||

मन येवढं येवढं
जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना || ७ ||

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियांत!
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामात! || ८ ||

देवा आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं! || ९ ||

- संत बहिणाबाई


या कवितेमध्ये बहिणाबाईंनी मनाच्या आंदोलनांचे नितांत सुंदर वर्णन केले आहे. आपल्या सर्वांना या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे मनाच्या चंचलतेचा अनुभव अनेक वेळा आला असेल. ही कविता आम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमात होती. या कवितेला मानिनी या चित्रपटात १९६१ मध्ये गाण्याच्या स्वरूपात स्थान ही मिळाले. हे गाणे आशा भोसले यांनी गायले होते. या चित्रपटाला संगीत वसंत पवार यांचे होते.

No comments:

Post a Comment

Please note that your comment will go live immediately after you click 'Post Comment' button and after that you will not be able to edit your comment. Please check the preview if you need.

You can use some HTML tags, such as <b>, <i>, <a> etc.